Headlines :
Home » , » विदर्भातील शक्तिपीठे

विदर्भातील शक्तिपीठे

Written By Admin on Sunday, October 2, 2011 | 9:29 AM

प्रासंगिक
स्रोत: तरुण भारत
विदर्भातील शक्तिपीठे
भारताची प्राचीन संस्कृती ही मातुल संस्कृती होती. आजही काही जाती-जमातींमध्ये ती पाहायला मिळते. ‘मातृप्रधान कुटुंबव्यवस्था’ ही त्यांची व नाग संस्कृतीची देण होय. त्याच काळापासून मातृदेवतेची पूजा-अर्चा होत होती. लेन एस. बँगडेल यांनी नेपाळवर लिहिलेल्या पुस्तकात वरील संस्कृतीचा व मातृदेवतेचा उल्लेख आलेला आहे. नेपाळच नव्हे, तर जगातील भूमध्यप्रदेशाच्या भागात युरोप व प्राचीनमध्ये आशियात देखील ती संस्कृती व मातृदेवता प्रचलित होती. नागपूर ते कोंढाळी मार्गावर माहूरझरी येथील उत्खननात महाश्म संस्कृतीचे जे बरेच अवशेष प्राप्त झाले, त्यात ‘नग्न कबन्धा’ व लज्जगौरीच्या प्रतिमा सापडलेल्या आहेत. ताम्र पाषाणयुगात ‘नेवासे’ जिथे ‘ज्ञानेश्‍वरी’ हा ग्रंथ लिहिला त्या गावी मातृदेवतेच्या सहा ते नऊ इंच उंचीच्या मूर्ती उपलब्ध झाल्या आहेत. (डॉ. देव महाराष्ट्र एक पुरातत्त्वीय पृ. क्र. ३२) मोहंजोदरो व हडप्पा येथील उत्खननानुसार पाच हजार वर्षांपूर्वी मातृदेवता ही अत्यंत पूज्य देवता मानली जात होती. तिची नित्य-नियमित पूजा होत होती. सिंधू संस्कृतीत मातृदेवता ही प्रजननशक्ती, सुपीकता अन् मातृत्वाची प्रतीकात्मक देवता म्हणून मानल्या गेल्या होती. त्यानंतर गंगेच्या खोर्‍यात वसलेल्या आर्यांमध्ये तिची उपासना सुरू झाली. श्री, श्रीमा, आदिती, पृथ्वी, श्री लक्ष्मी, गजलक्ष्मी या नावाने तिची पूजा-अर्चा होत होती. इ. स. पूर्व तिसर्‍या शतकातील शिलावर्तुळावर कोरलेल्या अनेक मातृदेवता तक्षिला, कौसाम्बी, मथुरा, रानघाट (प्राचीन वाराणसी) रूपर आणि बंशर (वैशाली) या ठिकाणी उपलब्ध झाल्या. नग्निका ही सर्वत्र दिसून येते. तसेच ती संरक्षक देवता होती. तीच ग्रामदेवताही ठरली. भारतात वेदकाळापासून मातृदेवतेची उपासना चालत आली आहे, असे रा. चिं. ढेरे म्हणतात. हिलाच भूदेवी, रेणूका, जोगुळांबा (संतानदात्री) या सर्व रेणुका म्हणूनच ओळखल्या जात. एकवीरा म्हणूनही तिचा नामोल्लेख केला जातो. माहूरझरी व माहूरची रेणुका संशोधकांच्या दृष्टीने एकच रूप असलेल्या देवता आहेत. माहूर (मातापूर) या स्थाननामात देवीच्या जनगन्मातृत्वाचे सूचन आहे. माहूरझरी हे स्थाननाम, देवीच्या जगमातृत्वाच्या दृष्टीने मातापूरच आहे. ते तिच्या मूळ स्वरूपाच्या दृष्टीने ‘पृथ्वीपूर’ असायला हवे, असे मत रा. चिं. ढेरे यांनी व्यक्त केले आहे. माहूरझरी येथे १९७१ मध्ये वाकाटक नृपती द्वितीय पृथिवीषेणाचा जो ताम्रपट उपलब्ध झाला आहे, त्यातील पृथ्वीपूर हे स्थळ माहूरझरी आहे. पृथ्वीपूर हे ग्रामवाचक नसून तीर्थनाम असावे. वाकाटककालीन अनेक वस्तू इथे सापडल्या आहेत. वाकाटक राजे आपणास ‘हारितीपुत्र’ असे म्हणत असत. पृथ्वी हे देवतावाचक आहे. ते मातृदेवतेचे मूलदर्शक पर्यायनाम आहे. माहूरझरी हे स्थान वाकाटककाळात मातृपूर आणि पृथिवीपूर या एकार्थक उभयनामांनी प्रसिद्ध असून, ते पृथिवी मातेच्या अथवा रेणुकेच्या उपासनेचे जागते केंद्र होते. हंटर यांनी त्यांना मिळालेल्या भूमीचे वर्णन ‘भूमीरूप मातृदेवता’ असे केले आहे. ते यथार्थ आहे. (लज्जागौरी पृ. ५३-५५) विराटाची राजधानी चिखलदरा म्हणून महाभारतात ओळखले जाते. कीचकाचा वध भीमाने इथे केला. भीमकुंड, गाविलगडचा किल्ला, यादवांचं गोंडांचं राज्य इथे झालं. अचलपूरच्या दिशेने असलेली तोफ त्या किल्ल्याच्या गडावर आहे, तिथेच डाव्या हातावर कपारीत कोरलेली, मुखवटा असलेली काळ्या पाषाणाची देवीची मूर्ती आपणास पाहायला मिळते. चंद्रभागा नदीचा उगम याच ठिकाणावरून झाला आहे. ही विराटच्या नगरीची संरक्षण देवता म्हणून ओळखली जाते. यादव, गोंडाचं हे दैवत आहे. मूर्ती अप्रतिम सुंदर आहे. पौराणिक व ऐतिहासिक असं महत्त्व तिलाही प्राप्त झालं आहे. सभोवताल नैसर्गिक वातावरण आहे. समोर भव्य अशी दरी आहे. नवरात्रात इथे बरीच गर्दी असते. मध्यप्रदेश व महाराष्ट्रातील आदिवासी मोठ्या प्रमाणात दर्शनाला येतात. तिचं स्वरूप नैसर्गिक वाटते. उगवत्या व मावळत्या सूर्याच्या प्रकाशात तिचा चेहरा खुलून दिसतो. खरे म्हणजे विराटाचा सूर्योदय वूसुर्यास्त पाहण्यासारखा आहे. पौराणिक व ऐतिहासिक महत्त्व तिला प्राप्त झालं आहे.
अमरावतीची रेणुका एकवीरा
यांची बौद्धपूर्व उपासना होत होती, असे डॉ. दामोदर धर्मानंद कोसंबी यांनी आपल्या ‘मिथ ऍड रीऍलिटी’ या लेखसंग्रहात उल्लेखिले आहे. बौद्धधर्मीय लोक स्तुपाला प्रदक्षिणा घालतात. त्याला ते देवीचे रूप मानतात. रा. चिं. ढेरेंच्या मते स्तुपाचा बाह्य आकार दर्शनावरून कित्येकदा शिवलिंगरूप मानला जात असला, तरी अंतरंग पाहता त्याचे मातृदेवतेशी एकत्व कल्पितादी श्रद्धाच प्राचीन धारणांशी संवादी वाटते. अर्थातच रेणुका देवी, एकवीरा या प्राचीन देवता आता तर मुखवटा (तांदळा) न राहता देवीची मूर्ती स्त्री स्वरूपात पाहायला मिळते. कोटवी हे अंबिकेचे रूप आहे. अंबादेवी आणि रेणुका यांच्या मूर्ती अमरावतीच्या देवी मंदिरात आहेत. या मंदिराची प्राचीनता सहजतेने लक्षात येते. परंतु कथाभाग असा आहे की, रुक्मिणी ही भीष्मक राजाची मुलगी होती. भीष्मक राजाचे राज्य कौंडण्यपूर येथे होते. रुक्मिणीचे श्रीकृष्णावर प्रेम होते. दर्शनासाठी आलेल्या रुक्मिणीने अगोदर बोलावून ठेवलेल्या श्रीकृष्णाबरोबर पळून गेली, ही महाभारतातील आख्यायिका प्रसिद्ध आहे. ‘गॅझेटियर फॉर हैदराबाद असाईन डिस्ट्रिक्ट’ मध्ये हे मंदिर हजारो वर्षांपूर्वी बांधलेले आहे. गो-ब्राह्मणप्रतिपालक हिंदवी स्वराज्याचे संस्थापक राजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाची पत्रिका अंबादेवीला आली होती, असा उल्लेख वरील गॅझेटियरमध्ये आलेला आहे. आता एकवीरा अंबादेवीचे मंदिर सुंदर व मोठे बांधण्यात आले आहे. निवासाची व्यवस्था करण्यात आली आहे. पूर्वी रेणुका व एकवीराचे मंदिर जुन्या पद्धतीचे होते. एकवीरा देवळापासून विहिरीपर्यंत एक भुयार आहे. त्यातील दोन खोल्यांत काही मूर्तीही सापडल्या आहेत. इ. स. १४९९ च्या यवनांच्या हल्ल्यात ते उद्ध्वस्त झाले असावे, परंतु त्याचा शोध आता लागला आहे. इ. स. १६४० मध्ये परकोटाच्या बाहेर केवळ जंगल होते. पावसाळ्यात पावसामुळे देवळाजवळील नाल्याला भयंकर पूर आला. सतत तीन दिवस पूर होता. पैलतीरावर जनार्दन स्वामी रेणुकेचे भक्त त्यांचे दर्शन झाले नाही. उपवासात त्यांचे दिवस जाऊ लागले तेव्हा काळी आई त्यांच्या स्वप्नात आली. विहिरीच्या वरच्या दगडात आपण स्थिरावले असल्याचे त्यांना सांगितले. त्यांनी पुनरुद्धार केला. ती अंबा म्हणून ओळखली जाते. नवरात्र हे महत्त्वाचे. त्या काळात संपूर्ण महाराष्ट्रातील लोक येतात. एकवीरा-अंबामातेचा आशीर्वाद प्राप्त करतात. ही काळ्या पाषाणाची मूर्ती देखणी, अप्रतिम सुंदर आहे. भक्तांसाठी जागत राहणारी, मनोकामना पूर्ण करणारी आहे.
विरज क्षेत्र लोणार श्री कमळजादेवी
जगप्रसिद्ध असलेले लोणारचे तळे जे उल्कापाताने निर्माण झाले त्याला ५० लक्ष वर्षे झाली, असे वैज्ञानिकांचे मत आहे. धार्मिक दृष्टीने लोणार विरज क्षेत्र म्हणून ओळखल्या जाते. गंगाभोवती धारेपासून जवळपास ४४ तीर्थे आहेत. अनेक ऋषी-महंतांनी व संतांनी या ठिकाणी तपश्‍चर्या केली. पापनाशिनी गंगाभोवती धारेखाली स्नान करून श्री कमळजादेवीची अनेकांनी आराधना केली आहे. श्री कमळजादेवीची मूर्ती काळ्या पाषाणाची आहे. देखणी आहे. समोर यज्ञकुंड आहे. अध्यात्मयोगी महापुरुषांना सारी योगसिद्धी प्राप्त करून देणारी ही देवी आहे. शक्तिस्वरूपिणी, वरदायिनी श्री कमळजादेवी ही अत्यंत प्राचीन आहे. पूर्वी तेथे दीपमाळ होती. श्री प्रभू रामचंद्र वनवासात दंडकारण्यात असताना या देवीचे दर्शन त्यांनी घेतले होते, असे लोकमत आहे. मारुती चितमपल्ली यांच्या लेखात वर्णन केल्याप्रमाणे हे मंदिर हेमाडपंथी आहे. तेलपाणी दिल्यावर दिलेल्या काळ्याशार पार्श्‍वभूमीवर या दीपमाळा मनात एखाद्या ऑयकॉनसारख्या कोरल्या गेल्या आहे, हे त्यांचं मत खरं आहे. मेहकरच्या बालाजी मंदिरापलीकडे एक जुनाट वाडा उद्ध्वस्त अवस्थेत आहे. तो कंचनीचा महाल. तिला लोणारच्या कमळजादेवीसमोरील दीपमाळेची ज्योती रात्री बघायच्या होत्या. त्यासाठी उंच महाल बांधायला सुरुवात केली. शेवटचा मजला चढला असता तर कंचनीला दीपमाळेच्या ज्योती दिसल्या असत्या. तिची अपार श्रद्धा श्रीकमळजादेवीवर होती. संतश्रेष्ठ योगीराज श्रीसखाराम महाराज यांनी रिसोडच्या देवीजवळ उपासना केल्यावर ते देखील कमळजादेवीची उपासना करायला आले होते. सरोवरातील निसर्गरम्य वातावरणातील हे स्थान सर्वांना मोहून टाकणारे आहे. लोणारचे प्रसिद्ध ग्रंथलेखक स्वामी सच्चिताश्रम हे इथे राहिले. जानेफळचे अवधुतानंद, गुंडाचे योगानंद यांनी श्री कमळजादेवीची आराधना केली. प्राचार्य सुधाकर बुगदाणे हे देखील संत मंडळीतील. लोणारवर त्यांचेही पुस्तक आहे. आज या मंगलकारी योगसिद्धी प्राप्त करून देणार्‍या प्राचीन देवीकडे दुर्लक्ष झाले आहे. आसामातील किंवा श्रीपादवल्लभाच्या घराण्यातील कुलदेविता असणार्‍या काळ्या आईसारखी ही मूर्ती आहे. भक्तांच्या नवसाला पावणारी आहे.
गुगुळादेवी
सिंदखेडराजा या गावाचे नाव काढले की आदराने मान खाली लवते अन् महाराष्ट्राचा भव्यदिव्य इतिहास ज्यांनी घडविला त्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या मातोश्रीची- जिजाऊंची- आठवण, त्यांची मूर्ती डोळ्यासमोर उभी राहते. श्री शिवाजी राजे यांचं हे आजोळ. लखुजीराव जाधवांची जहागीरदारी इथे होती. त्यांचे कन्यारत्न म्हणजे जिजामाता- राष्ट्रमाता होय. जाधवांचं नव्हे, तर बुलडाणा जिल्ह्यातील बर्‍याच लोकांचं कुलदैवत गुगुळादेवी आहे ही नवसाला पावणारी आहे. सामान्य महापराक्रमी दिग्विजयी इतिहासात अजरामर राहणारं राष्ट्रीय वृत्तीचं संतान आपणास व्हावं म्हणून जिजाऊनं तिला नवस केला. तिची ओटी भरली. चर्मरोगतज्ज्ञ डॉ. सावजी (पंचशील चौकात यांचा दवाखाना आहे) यांनी गुगुळादेवीचे महत्त्व, श्रेष्ठत्व मला ज्ञात करून दिलं होतं. आजही ज्यांना संतान होत नाही ते गुगुळा देवीला नवस करतात. सिंदखेड राजाजवळ गिरोली गावाच्या घनदाट जंगलात हेमाडपंथी असलेलं गुगुळादेवीचं मंदिर, देवालयाच्या गर्भगृहात गुगुळाची अर्ध तांदळा शेंदूरलिपीत प्रतिमा आहे. हरिणीसारखे डोळे, उंच कपाळ चेहर्‍यावरचं तेज डोळ्यात साठविता येत नाही. हे देऊळ अत्यंत प्राचीन असावे यात शंका नाही. जवळच्या पहाडावर एक नैसर्गिक गुहा आहे. तोंड अर्धवर्तुळावर आहे. हेमाडपंथी सभामंडप असून, शिवलिंग व नंदी आहे. गुहेच्या समोर पाषाणयुगीन मानवाने तयार केलेली हत्यारे दिसतात. त्यावरून स्थळाची कल्पना करता येते. प्राचीनत्व, पौराणिक व ऐतहासिक असं महत्त्व या देवीला प्राप्त झालं आहे.
अंजनगावसुर्जी जवळील मुर्‍हादेवी
अस्पृश्यता निवारणाची चळवळ ज्यावेळी सुरू झाली त्यावेळी अस्पृश्यांसाठी विदर्भातील ज्या देवीचे दरवाजे उघडल्या गेलेत अन् त्या संदर्भात राष्ट्रपिता म. गांधीजींचं पत्र ज्यांना प्राप्त झालं ते देवीचे संस्थान म्हणजे मुर्‍हादेवी संस्थान होय. काळ्या पाषाणाची असलेली ही मूर्ती अत्यंत प्राचीन असावी. तिला तेल वाहण्यात येत होतं. तेलाचं किटन तिच्यावर चढल्यामुळे मूर्तीचं खरं सौंदर्य डोळ्यात भरत नव्हतं. ती खोळ आता पडली आहे. देवीच्या बाजूलाच ती खोळ ठेवण्यात आली आहे. मुर्‍हाची देवी ही एकवीरा देवी आहे. ‘महिषासुरमर्दिनी’ असेही तिला म्हटल्या जाते. दुष्टात सुष्ट प्रवृत्ती निर्माण करण्याची शक्ती तिच्यात आहे. सातपुड्यातील भिल्ल, गोंड, कोरकू हे तिचे खरे भक्तगण आहेत. तसे नागरी मनुष्यांचेही दैवत देवी आहे. मूर-राक्षसाचा या देवीने इथे वध केला म्हणून आख्यायिका आहे. अनेक संत पुरुष इथे झाले. रंगपंचमीच्या दिवशी आदिवासी गोंड, कोरकू आपल्या पारंपरिक पद्धतीने देवीची पूजा करतात. झिंग्राजी महाराज येथीलच. नवरात्रात नऊ दिवस भक्तिगंगेत भिजून जातात. चैत्र महिन्यात एक महिना यात्रा असते. गणोजाची देवी अमरावती जिल्ह्यातील भातकुली हे जैनांचं तीर्थस्थान. याच भातकुली तहसीलमध्ये गणोजा हे गाव महालक्ष्मी देवीसाठी प्रसिद्ध आहे. अनेकांचं हे कुलदैवत आहे.
गणोजाची देवी
ही कोल्हापूरच्या महालक्ष्मीसारखी आहे. आता हे मंदिर नव्याने बांधण्यात आले आहे. त्यामुळे आधुनिक वाटते. पूर्वी जुन्या पद्धतीचे देऊळ असून समोर दीपमाळ होती. बाजूला सतीचं मंदिर होतं. पाचशे वर्षांपूर्वी गणू गणोरकर महाराज कोल्हापूरला महालक्ष्मीच्या वारीला पायी जात होते. म्हातारपणामुळे पुढे वारी करणे कठीण होईल, असे महालक्ष्मीला नमन करून सांगतिले. गणू महाराज गणोरकर एक सिद्ध पुरुष होते. ते गावाजवळ आले. त्यांचे गाव गणोरी. गावाच्या अगोदर त्रिवेणी संगम, पेढी, गोमी, नागझरी, संगमापर्यंत आले. त्या संगमावरच त्यांनी महालक्ष्मी देवीची स्थापना केली. गणू महाराजांकडे महालक्ष्मीचं स्थान तिथे स्थापन झाल्यामुळे त्या ठिकाणाला गणोजा म्हणण्यात आले. पुढे तिथे वस्ती निर्माण झाली. आज देवीसमोर दीपमाळ नाही. देवळात चांगली दत्तमूर्ती, शिवमूर्ती व सती प्रतिमा स्थापल्या आहेत. निवासाची चांगली व्यवस्था आहे. भाविकांच्या नवसाला पावणारी ही देवी विदर्भाची महालक्ष्मी आहे. तसेच नेरपिंगळा देवी हे देखील गडावर (पर्वताच्या शिखरावर) आरूढ झालेली आहे. या देवीवर अनेकांची श्रद्धा आहे. अंजनगाव सुर्जीच्या नबाबाने बांधून दिला आहे. अप्रतिम सुंदर मूर्ती आहे.
वैरागडची महाकाली (गोरजाई) मंदिर
भारतातील नागवंशीय लोक हे देखील मातृदेवतेचे उपासक होते. वैनगंगेच्या पूर्वेस वैरागड येथे माना जातीच्या राजांनी नवव्या शतकात आपली सत्ता स्थापन केली. या वंशातील पहिला राजा कुरुमप्रल्होद हा होता. त्याने वैरागड (ता. मूल) येथे किल्ले बांधले. त्याच वंशातील शेवटचा राजा गेहलू याने माणिकगड किल्ला बांधला. किल्ल्याच्या प्रवेशद्वारावर नाग प्रतिमा आहे. त्यामुळे तो किल्ला गोंडकालीन माणक्या गोंडाचा नाही. गोंडाचे जे किल्ले आहेत त्यावर ‘हत्तीवर आरूढ वाघ’ हे राज चिन्ह आहे. असो. त्याचाही आपण पुढे विचार करू. वैरागड हे गडचिरोली जिल्हा व आरमोरी तालुक्यात आहे. खोब्रागडी आणि सातनाला या नदीच्या संगमावर आहे. हे गाव द्वापारयुगातील चंद्रराज वंशातील वैरोचन राजाने वसविले आहे. पुढे त्याचा अपभ्रंश झाला व वैरागड म्हणून नावलौकिक प्राप्त झाले, असे इतिहासकारांचे मत आहे. हे मंदिर गावाच्या दक्षिणेस सुमारे १ कि. मी. अंतरावर स्थानिक शिव तलावाच्या जवळ असून सात नदीच्या किनार्‍यावर आहे. कॅनिहॅमच्या मते या मंदिराचे काम दोन टप्प्यांत पूर्ण झाले. पहिले मूळ मंदिर गर्भगृहाइतकेच होते, नंतर गर्भमंडप आणि अर्धमंडप या जिद्दल स्थापत्य रचनेत उभे झाले आहे. मंदिर पूर्वाभिमुख असून, बांधकाम मुरमी पाषाण व तालुका पाषाणातील आहे. अत्यंत प्राचीन असले तरी नक्षीकाम अत्यंत देखणे आहे. गर्भगृहात अष्टभुजी समपादात उभी असलेली देवीची मूर्ती आहे. तिने हातात खड्‌ग, कपाल, डमरू, ढाल आणि कमळ इ. आयुधे धरली आहेत. महाकाली म्हणून प्रसिद्ध आहे. गर्भगृहाचे प्रवेशद्वार अगदी साधे आहे. द्वारपल्लीकेवर नक्षीकाम नाही, कमळाचे अंकन कोरले आहे. त्यावरून हे मंदिर महाकालीचे मंदिर लोकश्रद्धेचा विषय बनले आहे. या ठिकाणी आज मोठ्या प्रमाणात नवरात्रात व चैत्रात यात्रा भरते.
चंद्रपूरची महाकाली व गडचांदूरची माणक्या देवी
चंद्रपूरपासून तर कोलकातापर्यंतचा भाग हा गोंडवना भाग म्हणून ओळखल्या जातो. वैरागड, माणिकगड, डोंगरगड ही देवीची स्थापना त्या काळी गोंडराजांनी केली. खांडक्या बल्लारशहा यांनी चंद्रपूरची स्थापना केली आहे. तेही झरपट नदीच्या जवळ असलेल्या गुहेमध्ये. त्यावेळी चंद्रपूर ही राजधानी नव्हती. तिथे जंगल होते. देवीच्या गर्भगृहात उतरण्यासाठी शिडीद्वारे जाता येत होते. महाकालीचा इतिहास गोंड वंशात आहे. आजच्या भव्य मंदिरात अगोदर हे मंदिर गोंडराजा वीरशहा यांच्या पत्नी हिराई हिच्या शासनकाळात बांधल्या गेले आहे. तेही १८ व्या शतकात. आता हे मंदिर भारत सरकार पुरातत्त्व विभागाच्या अंतर्गत आहे. ही एकवीरा देवी म्हणून प्रसिद्ध आहे. झरपट व इरई नदीचा संगम आहे. इरई अर्धचंद्राकार आहे. कुंतलपूरच्या चंद्रहास्य राजाने याच ठिकाणी राहण्याचे महाकालीमुळे ठरविले आणि आपली राजधानी तिथे आणली, हा प्राचीन इतिहास आहे. येथे चैत्र महिन्यात यात्रा भरते. आंध्र, तेलंगणा, मराठवाडा, विदर्भ येथून लोक येथे येतात.
माणक्यादेवी
नवव्या शतकात नागवंशीय सत्ता निर्माण झाली. पहिला राजा कुस्मपृहा हा होता. माना जातीचा नागवंशीय राजा गहिलु यांनी माणिकगडपर्यंत राज्य पसरले आहे. त्याच्या कुलदेवतेचे नाव देखील माणिकगड किल्ल्याला देण्यात आले आहे. हे मंदिर बौद्ध विहारासारखे आहे. प्रत्येक खांबावर नागमूर्ती आहे. ठिकठिकाणी ३२ आरे, २४ आर,े १२ आरे आणि धम्मचक्र देखील आहे. गौतम बुद्धाच्या मूर्ती आहेत. आज या किल्ल्याकडेे फार कमी लोक वळतात. पुरातत्त्व खात्याने त्याचं प्राचीनत्व लक्षात घेतलं आहे. उपेक्षित शक्तिपीठे भरभराटीला यावी, ही एकमेव अपेक्षा आहे.
भवानी मंदिर भटाळा
चंद्रपूर जिल्ह्यातील वरोडा या सुमारे ३००० वस्तीच्या गावात अत्यंत प्राचीन हे महालक्ष्मीचे मंदिर आहे. चिमूर रोडवर सालोरा फाट्यापासून ५ कि. मी. अंतरावर आहे. हे गाव इ. स . ४५ व्या शतकापासून अस्तित्वात होते, हे येथील शैलग्रह व शिल्पावरून कळते. हेनरी कझीन्स यांनी महाभारतात उल्लेखिलेल्या भद्रावती नगरीचा एक भाग आहे, असे म्हटले आहे. त्याला रायबहादूर हिरालाल यांनी मान्यता दिली आहे. परंतु आजच्या येथे मिळणार्‍या पुरावशेषांवरून हा इतिहास अश्मयुगाच्याही पलीकडे जातो. भवानी मंदिर आजही चांगल्या अवस्थेत आहे. याचा मंडम शुद्धमंडप असून मोठा आहे. दोन्ही बाजूस कक्षासन आहे. मध्यभाग गोलाकार अष्टकोनी आणि त्यानंतर कुंभाची रचना आहे. अशा प्रकारचे मंदिर अत्यंत दुर्मिळच आहे. गर्भगृहात भवानी देवीचे शिल्प असून, ती शेंदूरलिंपित आहे. गणेशपट्टी आहे. देवीचे रूप देखणे आहे. रूप, आयुधे आणि अन्य अलंकाराने स्पष्ट दिसत नाही, परंतु शिखरावर शुकानारीयुक्त नागर शैलीचे आहे. त्यावर आमलक व कळस आहे. गर्भगृह हे दक्षिणेस असून प्रवेशद्वार उत्तराभिमुख आहे. मंडप कक्षासनयुक्त आहे. मुख्य द्वार उत्तरेस व दुसरे पूर्वेस आहे. अनेक देवतांच्या कोरीव प्रतिमा आहेत. हे मंदिर इ. स. ११-१२ व्या शतकातील असावे. महालक्ष्मीची कमान आहे. त्यामुळे हे महालक्ष्मीचे देऊळ आहे. नवरात्र, चैत्रात दर मंगळावारी यात्रा भरते. भाविकांचे हे श्रद्धास्थान आहे.
कोराडीची देवी
कोराडीची देवी ही विदर्भातील प्रसिद्ध देवी आहे. नागपूरपासून केवळ १५ कि. मी. वर असलेले हे गाव. विदर्भ व मध्य प्रदेशाच्या लोकांचे दैवत आहे. स्त्रीस्वरूपात असलेली ही देवी महालक्ष्मी म्हणून प्रचलित आहे. माहूरझरीच्या रेणुका देवीशी ही आपलं नातं सांगणारी आहे. गोंड वंशात ज्या देवीची आराधना करण्यात येते त्यात तिचा समावेश होतो. पूर्वी हे मंदिर काळ्या दगडांच्या चिरेदार दगडांनी तत्कालीन वास्तुशास्त्राप्रमाणे बांधल्या गेले होते. तिचे गर्भगृह अत्यंत प्राचीन होते. पुढे तिचा सभामंडप भोसल्यांच्या राजवटीत बांधल्या गेला. मूर्ती अत्यंत देखणी, सुंदर असून, काळ्या पाषाणाची आहे. भाविकांच्या नवसाला पावणारी देवी म्हणून भक्तांमध्ये तिची महती आहे.
Share this article :

Post a Comment

 
Support : Creating Website | Johny Template | Mas Template
Copyright © 2011. USTAD SAYEEDUDDIN DAGAR - All Rights Reserved
Template Created by Creating Website Published by Mas Template
Proudly powered by Blogger